मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे जागावाटप आता पूर्ण झाले आहे. आता एकच बैठक होईल. त्या बैठकीत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेसचे नेते असतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर केले जाईल, असे खा. संजय राऊत म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीचा गुंता सुटला असल्याची चर्चा असली, तरी राहिलेले मुद्दे पडद्यामागे राहून पूर्ण केले जाऊ शकतात, असेही बोलले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ४८ पैकी किती मतदारसंघांत त्यांनी तयारी केली आहे आणि कोणत्या मतदारसंघांत त्यांची ताकद आहे हे त्यांनी बैठकीत सांगितले. राज्यातील २७ जागांवर वंचितने आपली ताकद असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा गुंता सुटला की नाही, अशी चर्चा रंगली. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. खा. राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीसह महाविकास आघाडीचे जागावाटप संपल्याचे जाहीर केले.
यापुढे बैठका नाहीत
खा. संजय राऊत यांनी आज स्पष्ट शब्दांमध्ये भाष्य करताना यापुढे बैठका होणार नसल्याचे सांगितले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीसह जागावाटप पार पडल्याचा मोठा दावा केला. महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हा मुद्दा त्यांनी स्पष्टपणे सांगितला नाही. वंचित आघाडीकडून जालन्यामधून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी, असेसुद्धा प्रस्तावात म्हटले होते. मात्र, आमच्याकडे तसा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वंचित मविआचा महत्त्वाचा घटक
वंचितकडून जो प्रस्ताव आला तो मोठा वाटत असला तरी तसे नाही. त्यांनी ज्या पद्धतीने तयारी केली ते त्यांनी सांगितले. आम्ही प्रत्येक जागेवर बैठकीत चर्चा केली. या संदर्भातील वाद अजिबात नाही. तसेच आम्ही तीन पक्ष नव्हे तर आम्ही चार पक्ष मानतो. ते म्हणाले की, वंचित हा मविआचा महत्त्वाचा घटक आहे.