मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संत महात्म्यांचा महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख आहे. परंतु गेल्या दोन वर्षात घोटाळेबाजांचा, वसुलीचा, खोकेबाजांचा, पक्ष फोडोफोडीचा, गुंडांना राजाश्रय देणारा महाराष्ट्र, अशी राज्याची नवी ओळख करण्यात शिंदे सरकारने मोठी प्रगती केली आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे आरोप केले.
वडेट्टीवार म्हणाले पुण्यात नवीन मुळशी पॅटर्न सुरू झाला. या नव्या मुळशी पॅटर्नचे खरे आश्रयदाते कोण आहेत. याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. आजी माजी नेत्यांमध्ये गुन्हेगार वापरण्यावरून वाद सुरू झाले आहेत. पुण्यातल्या गुंडांना क्राईम ब्रँचच्या काही सेवानिवृत्त अधिका-याचे मार्गदर्शन आहे. हा सेवा निवृत्त अधिकारी नोकरीत असताना आणि नोकरीत नसतानाही पुण्यातल्या टोळया चालवत आहे. राजकीय पदाधिका-यांना नेत्यांना धमकावण्यासाठी गुंडांना पॅरोलवर सोडले जात आहे. पुण्यात २०० गुंडांची परेड करण्याची वेळ आली. हे दुर्देव आहे. पुण्यात अमितेश कुमारांनी गुंडांची परेड घेतली. त्यानंतर काही दिवसातच २२०० कोटींचे ड्रग्ज सापडले.
पत्रकारांवर हल्ले सुरूच
पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विचारंवत विश्वंभर चौधरी यांच्यावर केलेला हल्ला म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. दहशत निर्माण करणारी ही तालिबानी वृत्ती आहे. पत्रकारांवर ही वेळ येत असेल तर राज्यात सुरक्षित आहे कोण हा खरा प्रश्न आहे. भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे, मुख्यमंर्त्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली. हे इजा-बिजा-तिजा सरकार महाराष्ट्राला उद्धवस्त करेल, अशी परिस्थीती आहे. कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने चक्क वर्षा निवासस्थानी जावून भेट घेतली. याच मुख्यमंत्र्यांच्या काळात वर्षा निवासस्थानावर ड्रग प्रकरणातील आरोपीने गणपतीची आरती केली होती. याचा अर्थ महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे असेही ते म्हणाले.
शिंदे, फडणवीस, पवारांवर जोरदार टीका
सरकारमधील कोल्डवॉरची जागा शस्त्र घेतील. काही दिवसांनी यांची मजल एकमेकांवर बाँम्ब फेकण्यापर्यंत जाणार आहे. इतकी सत्तेची लालसा, हव्यास या इजा-बिजा-तिजा मध्ये भरली आहे. शिवसेनेचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे कुणाचा हात आहे हे शोधले पाहिजे. ठाणे जिल्ह्यात संकेत भोसलेच्या अपहरणानंतर त्याला बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला होता. जीव वाचविण्यासाठी पोलिस ठाण्यात संकेत धाव घेत होता. मात्र, पोलिसांनी ही घटना आपल्या परिसरात घडली नसल्याचे सांगून टाळाटाळ केली.
ऑर्केस्ट्राच्या आडून डान्सबार सुरू
सत्ताधारी पक्षाचा नेता आई आणि मुलीवर बलात्कार करतो. त्यावर कोणी बोलत नाही या संपूर्ण प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्या आडून सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचा आशिर्वाद आहे. चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा करण्यात आला. राडा संस्कृतीला सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले.