नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला जनतेचा कौल नाही, त्यामुळे हे सरकार सत्तेवर येणार नाही. पण जनतेच्या मनाविरुद्ध, ‘ईव्हीएम’चा घोटाळा करून भाजप जिंकले तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट समाचार घेतला. हे ( विरोधक) जिंकले तर ईव्हीएम चांगली असते, पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर मात्र ईव्हीएम वाईट. हे असे धोरण आहे यांचे. आता त्यांना माहिती आहे की त्यांचा येत्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच ईव्हीएमबद्दल नकारात्मक बोलणे सुरू केले आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
फडणवीसांचा एकच सवाल
माझा, या ठिकाणी या सर्वांना एकच सवाल आहे. देशाच्या इलेक्शन कमिशनला ओपन चॅलेंज दिला आहे. ईव्हीएम टेम्पर करून दाखवा? आत्तापर्यंत एकही पॉलिटिकल पार्टी असे काही करू शकलेले नाही, असेही फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी केली होती टीका
माजी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात टीका केली. आज शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून संभ्रम पसरवला जातोय. जनतेचा या सरकारला कौल नाही. जनता या सरकारच्या पाठिशी नाही, त्यामुळे हे सरकार ही निवडणूक काही जिंकणार नाही, असे ते म्हणाले. पण तरीही जनतेच्या मनाविरुद्ध, ‘ईव्हीएम’चा घोटाळा करून भाजप जिकले तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. याच मुद्यावरून आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली आहे.