सोलापूर/प्रतिनिधी
जुळे सोलापूर भागातील प्रभाग क्रमांक २६ देवील कल्याणजगर चौकामध्ये पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे कल्याणनगर येथील अर्धा किलोमीटर परिसरात पाणी वाहून सर्वत्र पाणी साचले होते. याविरोधात महानगरपालिका प्रशासनाविरोधात संभाजी ब्रिगेडने वाहत्या पाण्यात कागदी नाद सोडून निषेध व्यक्त केला आहे.
उजनी धरण उणे १९ असून येणाऱ्या दिवसात पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा एक ते दोन दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे. महापालिकेकडून पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असताना गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जाण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. एक तर काही भागात आठ आठ दिवस पाणी देत नाही. रात्री अपरात्री पाण्यासाठी नागरिकांना वाट बघावी लागत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने चोख पाण्याचे नियोजन करण्यात यावे. जेणेकरून पाण्याची नासाडी होणार नाही, असे मत वा परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
एकीकडे महानगरपालिका नागरिकांना पाणी काटकसरीने वापरा असा सल्ला देते. दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे असे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या चौकामध्ये वारंवार पाण्याची गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात असते. तक्रार करून सुद्धा अधिकारी त्याची दखल घेत नाहीत. ऐन उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार असताना पाणी वाया जाण्यास कारणीभूत अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
कल्याणनगर परिसरातील अर्धा किलोमीटरपर्यंत पाणी साचले होते. याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने वाहत्या पाण्यात नाव सोडून निषेध व्यक्त करण्यात आला. भ्रमणध्वनीद्वारे ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. आयुक्त शीतल तेली उगले यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना याठिकाणी पाठवून जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईन गळतीचे काम युद्धपातळीवर करून दुरुस्ती केली आहे.असे संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी सांगीतले.