मुंबई : एकीकडं जागा वाटपावरुन वंचितनं महाविकास आघाडीच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. तर दुसरीकडं प्रकाश आंबेडकर हे उद्या मुंबईत होणार असलेल्या राहुल गांधींच्या न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेला हजेरी लावणार आहेत. स्वतः आंबेडकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप समारंभाला उपस्थिती लावण्यासाठी पाठवलेल निमंत्रण मला मिळालं आहे. त्यांचं हे निमंत्रण मी काल स्विकारलं आहे. त्यामुळं मी १७ मार्च रोजी शिवाजी पार्क इथं होणाऱ्या या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.
दरम्यान, उद्याच मी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना आमच्या राजगृह या निवासस्थानी जेवणाचं निमंत्रणही दिलं आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.