पुणे : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी (दि. १६ मार्च) लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. देशात एकूण सात निवडणुका होणार आहेत. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की आदर्श आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहते. आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक कामांवर आणि उपक्रमांवर बंदी घालण्यात येते. आचारसंहितेचा भंग केल्यास थेट कारवाईलाही सामोरे जावे लागते. आता रवींद्र धंगेकरांनी भाजपवर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेस नेत्यांकडून जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे. पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करत पक्ष चिन्हाचा प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
…तर काँग्रेसचे चिन्ह केबिनबाहेर लावणार
भाजप जाणूनबुजून शहरभर कमळ या चिन्हाचे वॉल पेंटिंग करत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. जर भाजप नेत्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे चिन्ह जिल्हाधिका-यांच्या केबिनबाहेर लावणार, असा इशारा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. आता यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.