धाराशिव : प्रतिनिधी
दोन गटांत झालेल्या राड्यात पाच जण जखमी झाल्याची घटना धाराशिवमध्ये घडली. अज्ञात कारणाने दोन गट आमने-सामने आल्यानंतर दगडफेक झाली असून खाजा नगर व गणेश नगर भागात हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणाव निवळला आहे. तसेच, परिस्थिती पूर्वपदावर आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव राडा प्रकरणी पोलिसांनी १२५ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक देखील केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी एका यू ट्यूब चॅनलच्या पत्रकाराला देखील अटक केली आहे. त्याच्यावर जमावाला भडकवल्याचा आरोप असून, अल्ताफ शेख असे त्याचे नाव आहे. धाराशिव शहरात सोमवारी रात्री दोन गटांत वाद झाला. वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. त्यामुळे दोन्ही गटांतील जमाव आमने-सामने आला आणि दगडफेक झाली. या राड्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मात्र, जमाव मोठा असल्याने अधिकचा पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. यावेळी पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या ३ नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर जमाव कमी झाला.
पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दोन गटांतील वादानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. धाराशिव शहरात झालेल्या राड्यानंतर धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी ३०७ व इतर कलमांतर्गत जवळपास १२५ पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, दगडफेकीच्या घटनेत अनेक वाहनांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. तसेच, ४-५ लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून इतर आरोपींचा देखील शोध घेतला जात असून, त्यांना देखील अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.