नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी पंच पंतप्रधान मोदी यांनी निवडले आहेत. मॅच सुरू होण्यापूर्वीच दोन खेळाडूंना अटक केली आहे. सरकारचा मॅचफिक्सिंगसारखा निवडणूक फिक्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, मॅचफिक्सिंग जिंकली, तर संविधान हरेल, त्यामुळे तुम्ही मॅचफिक्सिंगला बळी पडू नका, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने आज (दि. ३१) महारॅली आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. तपास संस्थांचा वापर विरोधकांविरोधात केला जात आहे. जर लोक निवडणुकीत ईव्हीएम नसेल, तर भाजपला १८० जागाही मिळणार नाहीत, असा दावाही गांधी यांनी यावेळी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना केलेली अटक हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असेही गांधी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मीडियावर दबाव आणला जात आहे. नेत्यांना धमकी दिली जात आहे. पैशांचा वापर करून सरकारे पाडली जात आहेत. पण तुम्ही भारताचा आवाज दाबू शकत नाही. ऐन निवडणुकीत काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे प्रचारासाठी पैसे नाहीत, पोस्टर लावायलाही आमच्याकडे पैसे नाहीत. देशाला धमकावून सरकार चालवले जाऊ शकत नाही. भ्रष्टाचाराला संपविण्यासाठी इंडिया आघाडी लढत आहे. संविधान वाचविण्यासाठी आमची लढाई सुरू आहे