27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रविलास लांडे अजितदादांची साथ सोडणार?

विलास लांडे अजितदादांची साथ सोडणार?

आढळराव पाटलांना तिकीट दिल्याने नाराजी

पिंपरी : प्रतिनिधी
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने डावलल्याने भोसरीतील माजी आमदार विलास लांडे दादांची साथ सोडणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचा ताप वाढणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने सर्वप्रथम डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, गेले तीन महिने महायुती ही जागा शिवसेनेला (शिंदेसेना) द्यायची की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला, की भाजपला द्यायची, याबाबत निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शिंदेसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपकडून महेश आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाची चर्चा होती.

जागा वाटपात राष्ट्रवादीला जागा मिळाल्यास पक्षातील कोणालाही संधी द्यावी, अशी मागणी लांडे यांनी केली होती. तर, लोकसभेच्या निमित्ताने महेश लांडगे आणि विलास लांडे यांचे मनोमिलन झाले होते. चर्चेच्या अनेक फे-यांनंतर जागा राष्ट्रवादीला दिली असली, तरी शिवसेनेचे आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने लांडे गट नाराज झाला. तसेच, आढळराव यांच्या पक्ष प्रवेशास लांडे अनुपस्थित होते. त्यामुळे लांडे गट नाराज असल्याचे वृत्त आहे.

दोनदा डावलल्याने लांडे संतप्त!
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून लांडे यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. मतदारसंघात पोस्टरबाजी करण्यात आली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यामध्ये अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवित उमेदवारी दिली. तरीही लांडे यांनी कोल्हे यांचे काम केले. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून लांडे इच्छुक होते. मात्र, त्यांचे सलग दोनदा तिकीट कापल्याने समर्थकांमध्ये नाराजी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR