मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राजकीय प्रतिस्पर्धी राहिले असले तरी या दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक आयुष्यात मात्र कमालीचे मैत्र होते.
२००६ साली शरद पवार हे आजारी असताना बाळासाहेबांनी आस्थेवाईकपणे चौकशी करणारे आणि प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन करणारे एक पत्र पवारांना लिहिले होते.
दरम्यान या पत्रात, फक्त महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आपली नक्कीच गरज आहे; परंतु देशाची भयानक अवस्था पाहिल्यावर आपल्यासारख्याची देशाला नितांत गरज आहे, असे बाळासाहेबांनी पवार यांना उद्देशून म्हटले होते. हेच पत्र शेअर करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुखांचे पत्र… शरदबाबूंना त्यांनी थोरला म्हणून आदेश दिला होता. प्रत्येक शब्दात आपलेपणा होता. नाहीतर द्वेष आणि सूडाने भरलेले आजचे राजकारण… कोण कधी मरतो याची वाट पाहणारे…नवीन पिढी हे वाचेल तर म्हणेल की, राजकारणात एवढे प्रेम, आपुलकी एकमेकांबद्दल होती,अशा शब्दांत आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त करत बाळासाहेब ठाकरेंनी लिहिलेले तेव्हाचे पत्र शेअर केले आहे.