इस्लामाबाद : केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका होताच पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनीही त्यांच्या सुटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. फवाद चौधरी यांनी केजरीवाल यांचा जामीन हा नरेंद्र मोदींचा मोठा पराभव असल्याचे वर्णन केले आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकताच मोठा दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. पण, त्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे. हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांच्यापुढे काही अटीदेखील ठेवल्या आहेत. ४९ दिवस तुरुंगात काढल्यानंतर केजरीवाल बाहेर आले आहेत.
फवाद चौधरी यांनी केजरीवाल यांचा जामीन हा नरेंद्र मोदींचा मोठा पराभव असल्याचे वर्णन केले आहे. तसेच हा निर्णय उदारमतवादी भारतीयांसाठी लाभदायक आहे असे म्हणत त्यानी अभिनंदनही केले. फवाद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले की, पीएम मोदी आणखी एक लढाई हरले, केजरीवालांना कोर्टाने सोडले, उदारमतवादी भारतासाठी चांगली बातमी. दरम्यान, दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने २१ मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. यापूर्वी ईडीने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी ९ समन्स बजावले होते. मात्र, केजरीवाल कोणत्याही समन्सवर हजर झाले नाहीत. ते या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि मद्य व्यापा-यांकडून लाच मागण्यात त्यांचा थेट सहभाग होता, असा केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे.