पुणे : राज्यभरात सध्या अवकाळी पावसाचे सावट असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीजा, वादळी वा-यांसह ठिकठिकाणी पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आला. विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यांसह काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव तर विदर्भात चंद्रपूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसानें हजेरी लावली.
तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने अंगाची लाही लाही होत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. त्यात पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदानावर परिणाम होऊ शकतोय.