पुणे : उरळी कांचन-जेजुरी रस्त्यावर शिंदवणे गाव हद्दीत कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटून नवीन बेबी कालव्याचा लोखंडी कठडा तोडून कार पाण्यात पडली आहे. या अपघातात एकाचा जागेवर मृत्यू झाला आहे तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.
हा अपघात गुरुवारी (दि. २३) सकाळी सहाच्या सुमारास घडला आहे. अमर साहेबराव घाडगे (वय २८, रा. जुन्नर) या कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गणेश संजय थोरात (वय २२) व शुभम शंकर इंगोले (वय २१, रा. दोघेही केसनंद ता. हवेली) व आदित्य महादेव तावरे (वय २०, रा. जुन्नर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेली माहिती अशी की, कारमध्ये असलेल्या चौघांचा बक-या विकण्याचा व्यवसाय आहे. आज सकाळी फलटण येथील बाजार असल्याने चौघेजण कारमधून निघाले होते. शिंदवणे गावाच्या हद्दीत असलेल्या कालव्यावर आले असता कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट कालव्यात पाण्यात कोसळली. यामध्ये कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कार कोसळल्याची माहिती मिळताच शेजारी राहणा-या नागरिकांनी मदत करून सर्वांना गाडीतून बाहेर काढले.