डोंबिवली : डोंबिवलीतील एमआयडीसी फेज २ मधील कंपनीमध्ये गुरुवारी, २३ मे रोजी भीषण स्फोट झाला. ओमेगा, अमुदान, हुंडाई सर्व्हिस सेंटर, अंबर केमिकल, सोहम इंजिनीअरिंगच्या बाजूचा परिसर या स्फोटानंतर आगीच्या विळख्यात आला. या स्फोटानंतर डोंबिवलीत खळबळ उडाली होती. गुरुवारीही काही मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. आज सकाळी (२४ मे) आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
एमआयडीसीमधील रासायनिक कंपनीत स्फोट झाल्याने डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला. या स्फोटाची कंपने २ ते ३ किलोमीटर परिसरात जाणवले. परिसरातील इमारतींच्या काचा या स्फोटात फुटल्या. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
डोंबिवली एमआयडीच्या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. या प्रकरणाच्या दुर्घटनांचा डोंबिवलीमध्ये इतिहास आहे. २०१६ साली देखील डोंबिवलीतील कंपनीत याच प्रकारे स्फोट झाला होता. त्यामध्ये मोठी जीवितहानी झाली होती. त्यामुळे या कंपन्या डोंबिवलीतून स्थलांतरित कराव्यात अशी मागणी यापूर्वी देखील करण्यात आली होती.