मुंबई : प्रतिनिधी
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्याची बोर्डाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यार्थ्यांना ग्रेस पासिंगसाठी दिलेल्या चित्रकला, क्रीडा, लोककलेच्या गुणांची पडताळणी बोर्डाकडून सुरू आहे. येत्या सोमवारी (ता. २७) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा २७ मे रोजी निकाल जाहीर होईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बोर्डाचे अधिकारी आता दिवसरात्र बसून निकाल जाहीर करण्याच्या तयारीत गुंतले आहेत. इयत्ता दहावीच्या जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली होती. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
१२ ते १५ जून दरम्यान राज्यातील बहुतेक अकृषिक विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत काही दिवस अगोदरच जाहीर केला. आता दहावीच्या विद्यार्थ्यांचाही निकाल लवकर जाहीर होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होण्याची संधी लगेचच दीड महिन्यात मिळणार आहे.
दोन विषय राहिल्यास ११वी प्रवेश : इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या कला शाखेत प्रवेश घेता येतो. पण, जुलैमध्ये होणा-या पुरवणी परीक्षेत किंवा मार्चमध्ये होणा-या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण विषयात पास व्हावेच लागणार आहे. त्याशिवाय त्याला पुढे इयत्ता बारावीला प्रवेश घेता येणार नाही.