लातूर : प्रतिनिधी
पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही आज काळाची मुख्य गरज बनली आहे. हे वाक्य केवळ नुसते बोलूनच नव्हे तर कृतीतून समाजाला पटवून देणारे म्हणजेच लातूरचे कृषि महाविद्यालय होय. ५० हजारांहून अधिक विविध जातीचे देशी वृक्ष, फुलझाडे, वेली, औषधी वनस्पती यांमुळे महाविद्यालयाचा परिसरावर जणू हिरवा गालीचा अंथरला आहे असा भास होत असून ऐन उन्हाळ्यातही परिसर नयनरम्य दिसत आहे.
या वृक्षसंपदेमुळे दररोज २० टन ऑक्सिजनची निर्मिती होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना ह्याचा लाभ होवून त्यांच्या आरोग्यासाठीही मोठा फायदा होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. इंद्र मणी यांची हि संकल्पना तर संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ.उदय खोडके यांचे यास मार्गदर्शन लाभले आहे. वृक्षसंपदेत अधिकाधिक वाढ व्हावी या हेतूने महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी अटल घनवन वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे.
यासोबतच घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त परिसर, गाजर गवत निर्मुलन, तंबाखू मुक्त परिसर, या व अशा विविध अभियानांमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये जनजागृती झाली असून ते स्वयंप्रेरणेने पर्यावरणाप्रती सजग राहून अहोरात्र परिश्रम घेत आहेत. हरित, सुंदर स्वच्छ ,सुरक्षित परिसर निर्मिती हीच यशाची चतु:सुत्री असल्याचेही ते आवर्जून नमूद करतात. विद्यार्थी, विद्यार्थिनी, मजूर, कर्मचारी, अधिकारी, प्राध्यापक व समस्त लातूरकर यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे महाविद्यालय शेतकरी, पर्यावरणप्रेमी, संशोधक यांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनले आहे.