छ. संभाजीनगर : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. शेवटच्या टप्प्यात विशेषत: मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये संथ मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्विट आणि जाहीर पत्रकार परिषद घेऊन याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. दरम्यान राज्याच्या विविध भागात मतदानाच्या दिवशी झालेल्या वादावादीतून ठाकरे गटाच्या नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होती. याची माहिती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मागविली आहे.
सत्ताधा-यांनी दबावाचे राजकारण करत शिवसैनिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत त्यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना खोटे गुन्हे दाखल झाले असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यांत, तालुक्यांमध्ये शिवसैनिकांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशा प्रकरणातील संपूर्ण तपशील आणि कागदपत्रे आपण माझ्याकडे पाठवावी, असे आवाहन दानवे यांनी समाज माध्यमांच्या मार्फत केले आहे.
२९ मेपर्यंत गुन्हा दाखल झाल्याची माहिती व त्या संदर्भातील कागदपत्रे प्रत्यक्ष भेटून किंवा मुंबईतील आपल्या शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठवावी, असेही दानवे यांनी म्हटले आहे.