मुंबई/वाशिम/लातूर/सोलापूर : राज्यात सोलापूर, लातूर, माढ्यासह वाशिम जिल्ह्यात वादळी वा-याने पावसाने जोरदार हजेरी लावलीये. त्यामुळे शेतक-यांना मोठा फटका बसला असून चाकूर येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी दु:खद घटना घडली आहे. शिवाजी नारायण गोमचाळे आणि ओंकार लक्ष्मण शिंदे असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील औसा, चाकुर, निलंगा तालुक्यातील अनेक भागात वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धानोरा शिवारात वादळी वा-यामुळे केळीच्या भागा भुईसपाट झाल्या आहेत. औसा तालुक्यातील धानोरा शिवारात वादळी वा-यामुळे शुक्राचार्य भोसले यांची तिन एकर केळीची बाग भुईसपाट झाली आहे. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळी वा-याला सुरुवात झाली जवळपास अर्धा तासांपेक्षा जास्त हे वादळ सुरू होते. या वादळात अनेकांचे पत्रेही उडून गेले आहेत. मोठ्या प्रमाणात झाडही तुटून पडले आहेत.
वाशिम, बुलडाणामध्ये पावसाची हजेरी
दिवसभर उष्ण वातावरणानंतर आज संध्याकाळच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात आज मालेगाव तालुक्यामध्ये अनेक भागात वादळी वा-यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात का होईना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वाशीमसह बुलढाण्यातही सायंकाळी अचानक आलेल्या वादळामुळे व अवकाळी पावसाने आसलगाव येथे शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
माढ्यात झाडें उन्मळून पडली
वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळ प्रचंड नुकसान झाले आहे. माढा तालुका परिसरात साधारणत: अर्धा तास तीव्र स्वरूपाचे वादळ होते. समोरच काहीच दिसत नव्हत. यामध्ये मोठं मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीच्या पिकांच, जनावरांच, विजेच्या खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. ३० ते ३५ वर्षापासून असलेली आंब्याची झाडे डोळ्यादेखत उन्मळून पडली आहेत. इकडे किती नुकसान झाले हे शब्दात सांगू शकत नाही. सद्या सगळीकडे अंधार आहे. सकाळी नुकसानीची दाहकता किती आहे हे आणखी समजू शकेल.
सोलापुरात वादळी वा-यासह अवकाळी
सोलापुरात ढगांच्या गडगडाटसह सोलापूर शहर आणि परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर येथील अनेक घरावरचे पत्रे उडाले आहेत. जोरदार वादळी वा-यामुळे दहा ते पंधरा घरांचे नुकसान झाले असून अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बागायतदार शेतक-यांची चिंता देखील वाढली आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची शक्यता
पुढील २४ तासांमध्ये मुंबईसह उपनगरांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील २४ तासांत मुंबईतील तापमान ३४ तर किमान तापमान २९ अंश राहिले असेही हवामान खात्याने नमूद केले आहे.