मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता पाहता आता काँग्रेस पक्ष प्रत्यक्षपणे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. राज्यातील अनेक दिग्गज काँग्रेस नेते वेगवेगळ््या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी करणार आहे. सोबतच सरकारकडून काय उपाय योजना केल्या जात आहे, यावर नजर ठेवण्यासाठी काँग्रेसने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली आहे.
यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मराठवाड्यासाठीच्या दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष राहणार आहेत तर विदर्भातील नागपूर विभागासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती असेल तर अमरावती विभागासाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील समिती पाहणी करणार आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात दुष्काळ पाहणी समितीची अध्यक्ष असतील. तर पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती काम करेल. सोबतच कोकण विभागासाठी नसीम खान यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता काँग्रेस प्रत्यक्ष मैदानात उतरून या भागांची पाहणी करणार आहे.
दुष्काळी स्थितीचा आढावा घेणार
राज्यातील बहुतांश भागात हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे तर अनेक मोठ्या धरणांनी तळ गाठल्याने आता केवळ टँकरचा शेवटचा सहारा नागरिकांना उरला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी राज्यातील वेगवेगळ््या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी करण्याचे ठरवले आहे. ही समिती दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहे.