नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी अहंकारी झाले आहेत. त्यांनी स्वत:च स्वत:ला देव घोषित केले आहे असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.
मुलाखतीत केजरीवालांनी असे म्हटले आहे. इंडिया आघाडीसाठी प्रचार केला, याचा काही फायदा होईल का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, गीतेत लिहिले आहे की, काम करा, फळाची चिंता करू नये. मी प्रचार केला आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पंतप्रधान मोदी महागाईवर बोलत नसल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केला. जनतेमध्ये भाजपबद्दल नाराजी आहे. महागाई आणि बेरोजगारीमुळे जनता हैराण झाली आहे. लोकांचा भाजपाबद्दल भ्रमनिरास झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयांवर बोलले नाहीत, उलट ते दोन महिन्यांपासून इकडच्या-तिकडच्या विषयावर बोलत आहेत. ते महाराष्ट्रात शरद पवारांना भटकणारा आत्मा म्हणतात, तर उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचा नकली संतान म्हणतात. या मुद्यांवर जनता त्यांना मत देईल का?
स्वत:ला देवाचा अवतार समजताहेत
पंतप्रधान मोदी आजकाल अहंकारी झाले आहेत. ते म्हणतात की, ते आईच्या उदरातून जन्माला आलेले नसून ते देवाचा अवतार आहेत. त्यांनी स्वत:च स्वत:ला देव घोषित केले आहे. पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये स्वत:ला प्रधान सेवक म्हटले, नंतर २०१९ मध्ये स्वत:ला चौकीदार म्हटले आणि आता २०२४ मध्ये स्वत:ला देव घोषित केले आहे असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
शाहांच्या धमकीला जनताच उत्तर देईल
पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या जागी राघव चढ्ढा यांना मुख्यमंत्री बनविण्याची चर्चा सुरू आहे? या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की गृहमंत्री अमित शाह अशा गोष्टी बोलत आहेत. त्यांनी पंजाबमध्ये जाऊन ४ जून रोजी सरकार पाडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार असल्याचे सांगितले. ७५ वर्षात कोणत्याही गृहमंत्र्यांनी असे विधान केले असा तुम्ही विचार तरी करू शकता का? अमित शाह यांच्या धमकीला जनताच १ जूनला उत्तर देईल.