सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून पुणे, मुंबई, तिरुपती आदी ठिकाणी जाण्यासाठी नियमित रेल्वे आहेत. त्या रेल्वे प्रवाशांसाठी सुविधेच्या आहे. त्यात्तच उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या असून लग्नसराईचा हंगामही आहे. अशा स्थितीत ज्या रेल्वे आहे त्यामध्ये प्रचंड गर्दी आहे. परिणामी लोकांना प्रवास करताना खूप अडचणी येत आहेत. में महिना तर सोडा, जूनच्या १५ ते २० तारखेपर्यंत रेल्वेगाड्या फुल्ल आहेत. परिणामी आरक्षण मिळत नसल्याने अनेकांनी दूरवर प्रवास करण्याचा बेत रद्द केला आहे.
उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्ट्या लागताच बहुतांश जण बाहेरगावी जाण्याचा बेत आखतात. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांपेक्षा सुरक्षित प्रवास म्हणून बहुतांश नागरिक रेल्वेलाच अधिक पसंती देतात. मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्या या खूप महत्त्वाच्या असतात, कारण मुलांना सट्टधांमध्ये मनसोक्त धम्माल, गप्पा, मज्जा, मामाच्या गावाला जाणं, यासह भरपूर काही करायचे असते. हाच प्रश्न आपल्या पालकांना असतो. उन्हाळी सुट्टयांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली.
त्यामुळे रेल्वे तसेच एसटीमध्येही सर्वत्र गर्दी बघायला मिळत आहे. तिकीट उपलब्ध होत नसल्याने तारांबळ उडत आहे. सोलापूर रेल्वेस्थानक येथे बहुतांश एक्स्प्रेस थांबतात; मात्र अनेक महत्वाच्या गाड्यांचे आरक्षण १५ जूनपर्यंत फुल्ल झाले आहे.मे महिन्यांतील आरक्षण वेटिंगवर असल्याने ऐनवेळी प्रवास कसा करावा, असा प्रश्न अनेक प्रवाशांसमोर आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेचा अतिशय सुरक्षित प्रवास मानला जातो. रेल्वेतून आरामदायी प्रवास होत असल्याने प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात.हुतात्मा, उद्यान, सिद्धेश्वर, हुसेनसागर, केके, नागरकोईल, वंदे भारत, चेन्नई आदी एक्स्प्रेस गाड्या थांबतात.