नवी दिल्ली : वृत्तसंस्था
येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत जो बाजी मारेल, तो सरकारची स्थापना करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर साधारण पाच ते सहा दिवसांत नव्या पंतप्रधानांचा शपथविधी होईल. दरम्यान, निकालानंतर सत्ताधारी भाजपात मोठे बदल होणार आहेत. पक्षात राष्ट्रीय पातळीवर बदल झाल्यास महाराष्ट्रातही भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर बदल होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या ७ टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले आहे. आता ४ जून रोजी थेट निकाल जाहीर केला जाईल. या निकालानंतर देशात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होईल. तत्पूर्वी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नरेंद्र मोदी सलग तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. भाजप मोदी यांना पंतप्रधानपदी कायम ठेवणार आहे. भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भाजपला मिळणार नवा अध्यक्ष
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाल येत्या ६ जून रोजी संपणार आहे. त्यानंतर नड्डा यांच्या जागी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नव्या नेत्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो. तसे झाल्यास महाराष्ट्र भाजपमध्येही फेरबदल होऊ शकतात.