लखनौ : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सपाने आतापर्यंतच्या इतिहासात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सपाने एकूण ३७ जागा जिंकल्या आहेत. यामुळे सपा उत्तर प्रदेशमध्ये क्रमांक एकचा तर देशात तिस-या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहे. सपाला हे यश धार्मिक मुद्यांऐवजी जातीय एकत्रीकरणाच्या रणनीतीमुळे मिळाले आहे. सपाने मागील लोकसभा निवडणूक बसपासोबत लढवली होती. तेव्हा त्यांना केवळ पाच जागा मिळाल्या होत्या.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या यूपीमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विरोधकांच्या प्रचाराचे नेतृत्व केले. सपाने इंडिया आघाडी अंतर्गत ६२ जागांवर निवडणूक लढवली होती.काँग्रेसला १७ आणि तृणमूल काँग्रेसला एक जागा दिली होती. जागावाटपाची ही रणनीती बरीच प्रभावी ठरली. काँग्रेससोबतच्या आघाडीमुळे राष्ट्रीय स्तरावर भाजपला पर्याय असल्याचा संदेशही मतदारांना देण्यात सपा यशस्वी ठरली, असे म्हणता येईल.
२०१९ च्या निवडणुकीत माजी कॅबिनेट मंत्री शिवपाल सिंह यांनीच सपापासून फारकत घेतली होती, मात्र यावेळी कुटुंबातील एकजुटीने चांगला संदेशही गेला. शिवाय तिकिट वाटपात अखिलेश यांनी जातीय समीकरणांची योग्य खेळी खेळली. याचा परिणाम उत्तर प्रदेश मध्ये सपा सर्वांत मोठा आणि देशात तिस-या क्रमांकाचा पक्ष बनला.