नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळाचे सोमवारी संध्याकाळी खाते वाटप जाहीर झाले. यामध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आता खासदार झालेल्या शिवराज सिंह चौहान यांच्यावर सर्वाधिक खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडणुकीत शेतकरी हा विषय मोदी सरकारसाठी महत्वाचा ठरला आहे, त्यामुळंच कृषी खातं हे भरवशाच्या अशा शिवराज सिंह चौहान यांच्याकडे देण्यात आले आहे.
अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जेपी नड्डा यांच्यानंतर शिवराज सिंह चौहान मोदींच्या मंत्रीमंडळातील पाचवे महत्वाचे मंत्री ठरले आहेत. चौहान यांच्याकडे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण कॅबिनेटमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालय आणि पंचायत राज मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवराज सिंह चौहान हे अकराव्या लोकसभेला अर्थात सन १९९६ मध्ये वाजपेयींच्या कार्यकाळात खासदार म्हणून निवडून आले होते. या काळात त्यांच्यावर शहरी आणि ग्रामीण विकास संबंधी समिती आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर १९९९-२००० या काळात कृषी संबंधीत समितीवर देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूणच ग्रामीण भारताशी सबंधित महत्वाची खाती शिवराज सिंह चौहान यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. त्याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेसह राजकीय सुधारणांसाठी मिळवून देण्याची जबाबदारी शिवराज सिंह चौहान यांच्यावर असणार आहे.