सोलापूर : मागील काही दिवसांपासून शहरात सतत पाऊस होत आहे. हे पावसाचे पाणी छत्रपती संभाजी महाराज तलावामध्ये आले आहे. यामुळे तलाव पूर्णपणे भरून गेला असून तलावाचे पाणी रस्त्यावर आले आहे. तलाव परिसरात असलेल्या बागेतही पाणी आल्यामुळे त्यासोबतच माशांची पिल्लंदेखील आली आहेत. लहान मुले ही माशांची पकडण्यासाठी बागेत येत आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस पडत आहे. हे पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच छत्रपती संभाजी महाराज तलावांमध्येदेखील पाणी येत आहे. महापालिकेतर्फे तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढला होता. हा गाळ शेजारी असलेला खाणीमध्ये टाकण्यात आला. या खाणीमध्येही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. खाण पाण्याने ओव्हर फ्लो होऊन त्यातील पाणी बाहेर पडत आहे. हे खाणीतले पाणी वसंत नगर येथील येथून जाणार रस्त्यावरून तलावात मिसळत आहे.विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव ओव्हरफ्लो झाला असून, रस्त्यावर पाणी आले आहे.
शहरातील काही सखल भागात पाणी साचले असून, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने सूर्यदर्शन झाले.
परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर पाणी आल्याचे महापालिकेला सांगितले त्यानुसार महापालिकेचे कर्मचारी वसंत नगर येथे आले होते. त्यांनी पाहणी केली असता हे पाणी ड्रेनेजमधून आलेले नसून पावसाचे पाणी आले असल्याचे सांगितले. तलावात पाणी आल्यामुळे तिथून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून तलावात जात आहे. यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. माजी सैनिक नगरच्या मागेदेखील अशीच परिस्थिती आहे. तलावाचे पाणी सैनिक नगर सभागृहाच्या मागे आले आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळा परिसरातदेखील तलावाचे पाणी आले आहे. बागेमध्ये फिरणाऱ्या नागरिकांना यामुळे अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. बागेतील बराचसा भाग तलावाच्या पाण्याने व्यापला गेला आहे. तलावाचे पाणी बागेत आल्यामुळे पाण्यासोबत माशांची पिल्लेही मोठ्या प्रमाणात आली आहे. हे पाहण्यासाठी व मासे पकडण्यासाठी लहान मुले गर्दी करत आहे.