फ्लोरिडा : वृत्तसंस्था
टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. गेल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा ७ गडी राखून पराभव केला होता. या विजयासह टीम इंडियाने सुपर ८ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. भारताचा पुढील सामना कॅनडाविरुद्ध आहे. हा सामना फ्लोरिडातील लॉडरहिल येथे खेळवला जाणार आहे. मात्र भारत-कॅनडा सामन्यापूर्वी फ्लोरिडामध्ये मुसळधार पाऊस झाला असून काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
फ्लोरिडाच्या मियामीमध्ये एक भयानक वादळ आले आहे. भरपूर पावसानंतर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक देखील बंद झाली आहे. मियामी आणि लॉडरहिलमधील अंतर सुमारे ४७ किलोमीटर आहे. त्यामुळे लॉडरहिल परिसरालाही फटका बसला.
शनिवारी म्हणजेच १५ जूनला भारत आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासोबतच पुराची शक्यताही व्यक्त करण्यात आली. गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पाऊस पडू शकतो. यानंतर शनिवार आणि रविवारीही परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे भारत-कॅनडा सामन्यावर पावसाचे ढग दाटले आहेत.
तीन सामन्यांवर पावसाचे सावट
अमेरिकेत सुरु असलेल्या पावसामुळे विश्वचषकाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पावसामुळे भारत विरुद्ध कॅनडा, अमेरिका विरुद्ध आयर्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध आयर्लंडच्या सामन्यावर सावट असणार आहे. तीनही सामने न झाल्यास अमेरिका सुपर-८ मध्ये जाणार असे दिसते
भारताचा सामना कोणाशी?
टीम इंडियाला सुपर-८ मध्ये तीन सामने खेळायचे आहेत. पहिला सामना २० जूनला आहे. दुसरा सामना २२ जून रोजी होणार आहे. हा सामना अँटिग्वा येथे होणार आहे. टीम इंडियाचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना २४ जून रोजी सेंट लुसिया येथे होणार आहे.