कोल्हापूर : प्रतिनिधी
पुणे-बंगळुरू महामार्गावरील भुतरामनहट्टीजवळ अपघातात कोल्हापूर येथील १६ विद्यार्थी जखमी झाले आहेत. कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अॅग्रिकल्चर महाविद्यालयातील विद्यार्थी जात असलेल्या बसला मागून एका ट्रकने काल सायंकाळी धडक दिली. यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
काकती पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. पोलिसांनी सांगितले, अॅग्रिकल्चर महाविद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक सहलीनिमित्त कर्नाटकात आले होते. त्यांनी धारवाड येथील कृषि विद्यापीठाला भेट दिली. तेथून परत जाताना भुतरामनहट्टीजवळ उतरले. याठिकाणी त्यांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. येथून कोल्हापूरला जाताना मागून ट्रकने धडक दिली. त्यामुळे बसमधील विद्यार्थी जखमी झाले.
बसमध्ये ४० पेक्षा अधिक विद्यार्थी होते. यापैकी १६ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहिती मिळाल्यानंतर काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी हलविले.