अक्कलकोट : संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कुरनूर धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण उपयुक्त पातळीत येणार असल्याने शेतकरी व परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे. गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे कुरनूर धरणात केवळ ३० टक्केच पाणीसाठा साठला होता. वास्तविक या धरणावर अकलकोट तालुक्यातील तीन नगरपालिकांसह ५२ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे, मात्र मागील वर्षी साठलेल्या अत्यल्प पाण्यामुळे विशेषतः शेतक-यांवर अस्मानी संकट ओढवले होते. गावा-गावातील पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला होता.
या धरणावर अवलंबून असलेल्या शेतकयांच्या पाईपलाईनचा वीजपुरवठा यापूर्वी खंडित करण्यात आला आहे. यामुळे यंदाच्या वर्षी परिसरातील उसाचे उत्पादन घटणार असल्याची चिंता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. बोरी व हरणा या दोन नद्यांवर या धरणातील पाणीसाठा अवलंबून आहे. सद्यस्थितीत हरणा नदी प्रवाहित झाल्याने मायनसमध्ये गेलेले धरण उपयुक्त पातळीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीची नक्षत्रे ही मोठ्या पावसाची असल्याने पाऊस कधी मोठा पडेल व कुरनूर धरण १०० टक्के कधी भरेल, याकडे आता सवांचे लक्ष लागले आहे.