भिवंडी : प्रतिनिधी
प्रक्षोभक वक्तव्य करण्यामुळे चर्चेत असणारे भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांच्या एका मागणीने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी ‘वक्फ बोर्ड रद्द करावा’, अशी मागणी केली. भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन व हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
धर्मसभेत बोलताना, महाराष्ट्रात १ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात १० लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावीत असे आवाहनही टी. राजा सिंह यांनी केले. तसेच या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते, असेही टी. राजा सिंह म्हणाले.
पुढे त्यांनी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाचे भय आहे. त्यांच्या मागे सर्व हिंदू समाज उभा आहे. त्यांनी मलंगगड मुक्त केला पाहिजे. मलंगगडला मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. पण तो दर्गा असल्याचे सांगून हिंदूंची थट्टा केली जात आहे. हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड मुक्त केला पाहिजे, अशी मागणी टी. राजा सिंह यांनी केली. तसेच ‘जो हिंदू हित की बात करेगा वह महाराष्ट्र पर राज करेगा’ अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा ४०० पेक्षा अधिक जागांवर विजय झाला असता तर भारत देश हिंदू राष्ट्र झाले असते,’ असे विधानही टी. राजा सिंह यांनी केले.
हिंदू-मुस्लिम बंधुत्वाचा नारा देत मुस्लिमांकडून लव्ह जिहाद राबवला जातो. महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतर यावर कायदा का होत नाही? असा सवालही टी. राजा सिंह यांनी केला. तसेच हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही, असेही टी. राजा सिंह म्हणाले.