सोलापूर / प्रतिनिधी
राज्याच्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या अनेकविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी दुपार सत्रात सोलापूर जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, राजन सावंत, विकास उकीरडे, रंगनाथ काकडे, शरद रुपनवर, सुनिल कोरे, अनिल बंडगर, किशोर गोडसे, संतोष हुमनाबादकर, बसवराज गुरव, मो.बा. शेख, अमोघसिद्ध कोळी, बाबासाहेब माने, दिनकर शिंदे, गजानन लिगाडे, किशोर बगाडे, राजाराम बनसोडे, हमजू मुलाणी, रावसाहेब सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगरपालिका शाळांतील शिक्षक पदमान्यतेसाठी असलेले निकष बदलून संच मान्यतेचा नवीन शासन निर्णय १५ मार्च रोजी पारीत करण्यात आल्याने शिक्षकांची अनेक पदे कमी होणार आहेत. २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे डी.एड. पदविका धारक सुशिक्षित बेरोजगारांची नोकरीची संधी हिरावली जाणार आहे.
समूह शाळा योजना,
दत्तक शाळा योजना यामुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या शिक्षणापुढे या धोरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नंदकुमार पवार यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन पक्षाच्या वतीने समर्थन दिले. यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, मुख्यालय विस्ताराधिकारी हरीश राऊत, सुदर्शन राठोड यांनी भेट देऊन निवेदन स्विकारले. आणि शिक्षक समितीची भूमिका शासन दरबारी पोहचविण्यात येईल व जिल्हा परिषद स्तरावरील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली.