१९९ मतदारसंघांत सर्वेक्षण
मुंबई : प्रतिनिधी
मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण आरक्षणाच्या मुद्यावर जर ते निवडणूक लढवणार असतील तर आम्हीही त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ, असे वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केले. राज्यातील १९९ विधानसभा मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सरकारने मराठ्यांना टिकणारे १० टक्के आरक्षण दिले असून त्याचा लाभ मराठा समाजाने घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आता यावर राजकारण सुरू केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला.
विधानसभा कुणी लढवावी आणि कुणी नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसी उमेदवारही उभा राहतील, आमचे बहुमत आहे. ६० टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतले तर आम्ही ८० टक्के जातो. आमचेही १९९ मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाले असून आम्हीही तशीच भूमिका घेऊ शकतो, असे शेंडगे म्हणाले.
मराठा समाजाला सरकारने टिकणारे १० टक्के आरक्षण दिले आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मराठा समाजाने ते आरक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. यामधील १० टक्क्यांपैकी ८.५ टक्के आरक्षण मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतले आहे, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.