कल्लाकुरीची : तामिळनाडूतील कल्लाकुरिची येथे विषारी दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता ३५ वर पोहोचली आहे, तर ६० हून अधिक जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी पाकिटांमध्ये उपलब्ध दारूचे सेवन केले होते.
१८ जून रोजी कल्लाकुरिची जिल्ह्यातील करुणापुरम येथे घडलेल्या घटनेतील बहुतेक बळी रोजंदारी मजूर होते. दारू प्यायल्यानंतर रात्रीच्या वेळी या लोकांना जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि डोळ्यात जळजळ होण्याचा त्रास होऊ लागला. या प्रकरणी पोलिसांनी के कन्नुकुट्टी (४९) याच्यासह ४ जणांना अटक केली आहे. कन्नूकुट्टी येथून मिथेनॉल मिश्रित सुमारे २०० लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली. कल्लाकुरीची येथे १२ रुग्णवाहिका तैनात आहेत. मृतांचे पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे. अहवाल आल्यावर मृत्यूचे खरे कारण समोर येईल. या घटनेनंतर राज्य सरकारने कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी-एसपी यांना हटवले आहे. त्यांच्या जागी एमएस प्रशांत यांची जिल्हाधिकारी आणि रजत चतुर्वेदी यांची एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी होणार
एआयएडीएमकेच्या वकिलांनी मद्रास उच्च न्यायालयात कल्लाकुरिची प्रकरणावर तातडीने सुनावणीसाठी अपील केले. न्यायमूर्ती डी कृष्णकुमार आणि न्यायमूर्ती के कुमारेश बाबू यांच्या खंडपीठाने २१ जून रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले. मुख्यमंत्र्यांनी मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी गोकुळदास यांच्या अध्यक्षतेखाली मद्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.