मुंबई : सलामीवीर शफाली वर्माचे दमदार द्विशतक, स्मृती मंधानाची शतकी खेळी आणि स्रेह राणाची अप्रतिम गोलंदाजी याच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर १० गडी राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ बाद ६०३ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावांवर तर दुसरा डाव ३७३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला शेवटच्या डावात केवळ ३७ धावांचे आव्हान होते. हे आव्हान भारतीय महिला संघाने चौथ्याच दिवशी पार केले आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.
पहिल्या डावात शफाली वर्माच्या २०५ धावा आणि स्मृती मंधानाच्या १४९ धावांच्या बळावर भारताने ६०३ धावापर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या स्रेह राणाने अप्रतिम गोलंदाजी केली. तिने ७७ धावा देऊन तब्बल ८ गडी टिपले. आफ्रिकेकडून मारिझेन काप हिने ७४ तर सुने लूझ हिने ६५ धावा केल्या. फॉलो-ऑनचा खेळ पुढे सुरु करताना दुस-या डावात कर्णधार लॉरा वूल्फार्डने १२२ तर सूने लूझ हिने १०९ धावा केल्या. त्यामुळे आफ्रिकेने दुस-या डावात ३७३ धावा केल्या. पण त्यांच्या दोन्ही डावांची बेरीज भारतापेक्षा केवळ ३७ धावाच जास्त झाली. त्यामुळे भारताला मिळालेले हे आव्हान सलामीवीरांनी ९.२ षटकात पूर्ण केले.