लातूर : प्रतिनिधी
पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळ बोलावले खरे परंतु, विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत अडकलेल्या मुख्यमंत्री व संबंधितांना शिष्टमंडळासाठी वेळच नाही त्यामुळे दोन दिवसांपासून शिष्टमंडळ मुंबईत ताटकळत बसवले गेल्याने लातूर येथील उपोषणकर्ते संतप्त झाले असून १४ जुलैपासून पाणी न पिण्याचा इशारा दिला आहे.
धनगर समाजाच्या अनुसूचीत जमाती आरक्षणा संदर्भात तात्काळ अंमलबजावणी करावी तसेच खिल्लारे कुटुंबियांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी २८ जुलैपासून चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर लातूर येथील पु. अहिल्यादेवी होळकर चोकात बेमुदत उपोषणास बसले आहेत. याची दखल घेत्पालकमंत्र्यांनीबुधवारी शिष्टमंडळ मुंबईत बोलावले आहे व चर्चाही केली मात्र तोडगा निघाला नाही. त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु सदरील शिष्टमंडळ तीन दिवसांपासून विधिमंडळाच्या दारासमोर चर्चेच्या नियंत्रणासाठी ठाण मांडून बसले आहे. परंतु, सत्ताधारी विधानपरिषद निवडणुकीत अडकल्याने शिष्टमंडळाकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे.
या घटनेमुळे सकल धनगर समाज तसेच उपोषणकर्ते संतप्त झाले असून शासनाच्या निर्णयाची दोन दिवस प्रतिक्षा करून १४ जुलैपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला असून पाणी पिणे ही सोडणार असल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी या उपोषणास १५ दिवस झाले असून दोघा उपोषणकर्त्यांची शारीरिक परिस्थिती नाजूक बनत चालली आहे.दोघांच्याही वजनात कमालीची घट झाली असून त्यांच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या उपोषणाला जिल्हाभरातून धनगर समाज बांधव वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करुन पाठींबा देत असून दिवसेंदिवस असंतोष वाढत आहे.
दरम्यान, समाज बांधव व अन्य संघटना उपोषणकर्त्यांची भेट घेऊन समर्थन देत असून अनेक जण शासनाच्या दिरंगाई बद्दल संताप व्यक्त्त करत आहेत व दोहोंची बिघडत असलेली प्रकृती लक्षात आणून देऊन उपोषणाचा किडनीवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांना जाणीव करुन देऊन उपोषणकर्त्यांनी जागेवर वैद्यकीय उपचार घ्यावेत, अशी विनंती करत आहेत.