सोलापूर: सरासरी क्षेत्रापेक्षा ९१हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून आणखीन पेरणी सुरुच आहे. सोयाबीन, मका व तुरीचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षी यावर्षी पेरणी झालेल्या क्षेत्राच्या ५० टक्क्यांपर्यंत ही पेरणी झाली नव्हती. यावर्षी पाऊस लवकर सुरू झाल्याने पेरणीही लवकर उरकली जात आहे. जिल्ह्यात सरासरी खरीप पेरणी क्षेत्र २ लाख ८९ हजार ५७० हेक्टर असले तरी ३ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने ऊस क्षेत्र कमी झाले आहे.त्या जमिनीवर तूर, मका पेरणी होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले,काही शेतकऱ्यांनी पाऊस चांगला पडला तर पाण्याचा प्रश्न सुटेल असे सांगीतले.
पाऊस मार्गी लागेल या अपेक्षेने सोयाबीन पेरले असून सोयाबीन काढणी करुन ऊस लागवडीचे नियोजन आहे.इकडे पेरणीवर अवलंबून विमा भरण्यात येत आहे. जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार शेतकऱ्यांनी ३ लाख २६हजार हेक्टर क्षेत्रासाठी विमा भरला आहे. विमा भरण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत असल्याने अर्ज व क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर सोलापूर, मोहोळ व करमाळा तालुक्यात सरासरीच्या दुप्पटीहून अधिक व तिप्पट क्षेत्रात पेरणी झाली आहे. सरासरी इतकी ही पेरणी न होणाऱ्या पंढरपूर तालुक्यात यंदा चांगली पेरणी झाली असून उसाची जागा खरीप पिकाने घेतल्याचे दिसत आहे. मागील वर्षी उशिरा पावसाला सुरुवात झाली होती. उशिराने पेरणीला सुरुवात झाली होती. यंदा पाऊस लवकर पडल्याने पेरणी लवकर झाली आहे. आणखीन पेरणी सुरुच असली तरी आता वेग कमी झाल्याचे सांगण्यात आले.