मुंबई : अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट पाहिला. कार्तिक आर्यनने सिनेमात भारताचे पहिला पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली. सिनेमा पाहिल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी कार्तिकचे भरभरुन कौतुक केले. कार्तिक हा सर्वात मेहनती अभिनेता आहे असे ते म्हणाले. तसेच आपल्या करिअरची तुलना त्यांनी कार्तिकच्या करिअरशी केली. त्याच वेळी बोलताना त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या फिल्म इंडस्ट्रीतील एन्ट्रीबाबत एक दावा केला.
झूमला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, कार्तिक खूपच मेहनती मुलगा आहे. त्याला जे यश मिळाले आहे त्यासाठी तो पात्र आहे. चंदू चॅम्पियनमध्ये तो खूपच डेडिकेटेड आणि पॅशनेट दिसतोय. त्याच्यात काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द आहे. इतर पुरस्कारांप्रमाणेच राष्ट्रीय पुरस्कारासाठीही तो पात्र आहे. जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो होतो, तेव्हा मी कार्तिक सारखाच आऊटसाइडर होतो. अमिताभ बच्चन तर इंदिरा गांधीच्या शिफारसीने आले होते.
माझ्याकडे तर काहीच नव्हते. फक्त आत्मविश्वास होता. तोच आत्मविश्वास आज कार्तिकमध्ये दिसत आहे. मी जितेंद्र आणि धर्मेंद्रसारखा ‘गोरा चिट्टा पंजाबी’ नव्हतो. दर दहा वर्षात फिल्म इंडस्ट्रीत असा आऊटसाइडर येतो, जो इंडस्ट्रीवर राज्य करतो. अक्षय कुमारनंतर तो कार्तिक आर्यन आहे असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, गेल्या महिन्यात ‘चंदू चॅम्पियन’ रिलीज झाला. या सिनेमातील भूमिकेसाठी कार्तिकने शरीरयष्टीवर खूप मेहनत घेतली होती. सिनेमाने बॉक्सऑफिसवर सुमारे ६१ कोटींची कमाई केली.