अहमदनगर : भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. आम्ही २०१४ ला मरठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात घेतली होती. याबाबत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाह बोलल्यानंतर मी उत्तर देणं योग्य नाही, मात्र काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. मुंडेंनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने घेतले साई समाधीचे दर्शन घेतले. अनेक वर्षांनंतर धनंजय मुंडे साई दर्शनाला आले होते.
धनंजय मुंडे म्हणाले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे माझे राजकीय गुरू आहेत. मात्र अजित पवार यांनी मला अतिशय कठीण प्रसंगात राजकीय आधार दिला. गुरू आणि मोठे बंधू म्हणून अजितदादांनी मला इथपर्यंत पोहचवले. माझे खरे गुरू अजित पवारच आहेत. स्वबळाच्या चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहेत. महायुतीतील कोणताही पक्ष स्वबळावर निवडणुक लढवणार नाही. आम्ही एकत्र लढणार यात तीळमात्र शंका नाही. भाजप त्यांच्या जागांसंदर्भात निर्णय घेईल असेही मुंडे यांनी सांगितले.
विशालगडाच्या प्रकरणानंतर शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी कोणतही वक्तव्य केलं नाही. उध्दव ठाकरे धारावी संदर्भात अनेक आरोप करतात. धारावी अडाणींच्या खिशात घालण्याचा प्रयत्न महायुती करतेय असा आरोप त्यांनी केला. तुम्ही मुख्यमंत्री असताना शेकलीन नावाच्या कंपनीला तुम्हीच काम दिलं होते. ते रद्द कुणाच्या काळात झालं आणि अडाणींना दिलं याचा अभ्यास माध्यमांनी करावा. धरावीच्या पूर्वीच्या टेंडर प्रक्रियेबाबत उध्दव ठाकरेंनी उत्तर द्यावं. आमचा उपयोग फक्त लोकसभेसाठी केला आणि वा-यावर सोडले हे आता मुस्लिम समाजच म्हणतोय, असेही मुंडे यांनी सांगितले.