मुंबई : कोणत्याही सरकारी अधिका-यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरची बंदी हटवणे म्हणजे देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका असल्याचा इशारा एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिला आहे. जे लोक तिरंग्याला मान देत नाहीत, हिंदुत्वाला देशाच्या वरती समजतात त्यांच्याप्रति प्रामाणिक असलेला सरकारी कर्मचारी हा देशाप्रती प्रामाणिक असू शकत नाही असेही ते म्हणाले. सरकारी कर्मचा-यांनी संघाच्या कार्यक्रमात आणि शाखेत जाऊ नये अशी बंदी असणारा ५८ वर्षांपूर्वीचा आदेश नरेंद्र मोदी सरकारने मागे घेतला आहे. त्या आदेशावरून असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात भाग घेण्यास असलेली सरकारी अधिका-यांना असलेली बंदी हटवून सरकारने देशाच्या अखंडतेला धोका निर्माण केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधान कधीही मानले नाही, त्यांनी राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार केला नाही, राष्ट्रगीताचा मान राखला नाही. त्यामुळेच सरकारी कर्मचा-यांना शाखेत जाण्यासाठी आणि संघाच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बंदी आणण्यात आली होती असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले. हिंदुत्व हे देशाच्या वरती आहे अशी शपथ आरएसएसवाले घेतात अशी टीका ओवैसी यांनी केली. जर कोणताही सरकारी कर्मचारी हा संघाप्रति निष्ठा राखत असेल तर तो देशाप्रति निष्ठा राखणारा नसेल असा आरोप ओवैसी यांनी केला.