कोल्हापूर : प्रतिनिधी
पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगेने धोका पातळी गाठली आहे. त्यामुळे चिखली (ता. करवीर) गावातील नागरिकांनी स्थलांतर करण्यास आज (दि. २४) सुरुवात केली आहे. पहिल्यांदा जनावरांचे स्थलांतर केले जात आहे. त्यानंतर जीवनावश्यक साहित्यासह नागरिक स्थलांतर करणार असल्याचे सांगितले जात आहे.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार कायम असून पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडत आहे. राधानगरी धरणातून १५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर दूधगंगा धरणात सरासरी पाणी पातळी झाल्यामुळे नियंत्रणासाठी १६०० क्युसेक विसर्ग होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूर परिस्थितीमध्ये वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पूरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज
संभाव्य पूरस्िथतीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नदी किना-यावरील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आपत्कालीन प्रसंगाला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. यावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आवाहन केले आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी ४१ फुटांवर
पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरूच आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४१ फूट ११ इंचावर पोहोचली आहे. धोका पातळी ४३ फूट आहे. मुसळधार पावसामुळे ८१ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे.
पूरग्रस्त भागातील १५७ कुटुंबे सुरक्षित स्थळी
जिल्ह्यातील सर्वच नद्या या संथगतीने धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने नदीकाठी चिंता वाढली असून, त्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त भागातील १५७ कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली आहेत. तर २० मार्गावरील एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.