पाटणा : वृत्तसंस्था
एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. त्यांच्या लग्नाला ५७ वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षांनंतर पत्नीने पतीला असं काही सांगितलं की त्याने तिचे ५७ तुकडे केले. बिहारच्या अरवाल जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे.
जमुहरी गावातील हे प्रकरण. ७६ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसादने पत्नी सुमती सिन्हाची हत्या केली आहे. आरोपी बिरबलने कुटुंबातील इतर सदस्यांना खोलीत बंद करून हे कृत्य केल्याचे सांगितले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुलगा खासगी शाळेतून घरी आला असता घरात रक्त पाहून आरडाओरडा करू लागला. यादरम्यान बिरबलने सून आणि नातवासह गावक-यांना हातात धारदार शस्त्र घेऊन धमकावण्यास सुरुवात केली.
या घटनेची माहिती मिळताच मेहंदिया पोलिसांनी घटनास्थळ गाठून मारेक-याला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून धारदार शस्त्र जप्त केले आहे. या संदर्भात एसपी राजेंद्र कुमार भील यांनी सांगितले की, सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद याला अटक करण्यात आली असून त्याने पत्नीचे ५७ तुकडे केल्याचा दावा केला आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी बिरबल प्रसादने सांगितले, लग्नाला ५७ वर्षे झाली होती, त्यामुळे त्याने पत्नीचे एकूण ५७ तुकडे केले. पोलिसांनी सांगितले की, मृतदेहाचे सुमारे १२ तुकडे करून विच्छेदन करण्यात आले होते. या घटनेची संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे.
बिरबलची पत्नी सुमतीने आपल्या काकांशी अवैध संबंध होते असे सांगितले. त्यानंतर बिरबल संतापला. तिचे काका ८ वर्षांपूर्वी वारले. तरी या अवैध संबंधाची माहिती मिळताच बिरबलने रागाच्या भरात सुमतीची धारदार शस्त्राने हत्या केली