रायगड : राज्यात पावसाने हाहाकार उडवला असून मुंबई, पुण्यासह कोकणातही मुसळधार पाऊस पडत आहे. सावित्री नदीनेही रौद्ररुप धारण केले असून पाण्याने पुलाची पातळी गाठल्याचं पाहायला मिळत आहे. डोंगर माथ्यावरती जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे महाडमध्ये सावित्री नदीतने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत ८३ टक्के वाढ झाली असून धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ६ गेट मधून ३.३५ घमी/से एवढा पाण्याचा विसर्ग करम्यात आला आहे. तर, नदी पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दुसरीकडे बुधवारी गांधारी नदी देखील दुथडी भरुन वाहत होती, महाडमधील बिरवाडी भागातील कुंभारवाडा परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी साचल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
महाडमध्ये सावित्री नदिने रौद्ररुप धारण केल्याने महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे, प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाडमधील नदी किनारी भाग पुराच्या विळख्यात असून शहरात एनडीआरएफची टीम तैनात आहे.