नवी दिल्ली : : देशभरात आज कारगिल विजयाचा २५ वा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. या दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लडाखमधील द्रास येथे पोहोचले आणि कारगिल युद्ध स्मारकावर देशातील शूर शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या शत्रू आणि दहशतवाद्यांना थेट इशाराही दिला. भारत कोणत्याही उद्धटपणाला चोख प्रत्युत्तर देईल, पाकिस्तानने यापूर्वी कितीही प्रयत्न केले, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र पाकिस्तानने आपल्या इतिहासातून काहीही शिकलेले नाही. अशी सडकून टीका पंतप्रधान मोदींनी पाकवर केली.
लडाखमधील द्रास येथील कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत असताना मोदी म्हणाले की, आज मी अशा ठिकाणाहून बोलत आहे जिथे दहशतवाद्यांना माझा आवाज थेट ऐकू येईल. दहशतवादाच्या या समर्थकांना मी सांगू इच्छितो की त्यांचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. आमचे शूर जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने चिरडून टाकतील. शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा
इशाराही पंतप्रधानांनी दिली.
पाकिस्तानने अविश्वासू चेहरा दाखवला- मोदी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त सांगितले की, कारगिल युध्दापुर्वी भारत शांततेसाठी प्रयत्न करत होता. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला अविश्वासू चेहरा दाखवला. पण सत्यासमोर असत्य आणि दहशतीचा पराभव झाला. आम्ही फक्त कारगिलचे युद्ध जिंकले नाही. तर आम्ही सत्य, संयम आणि शक्तीचे अप्रतिम प्रदर्शन केले होते, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.
राहुल गांधींनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली
दरम्यान, कारगिल विजय दिनानिमित्त, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधींनी ही शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. राहुल गांधींनी भारताच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणा-या अमर हुतात्म्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानासाठी देश त्यांचा सदैव ऋणी राहील. अशी पोस्ट करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.