कोल्हापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे. यात्रा आज कोल्हापूरमध्ये पोहोचली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी शिवसेना, भाजप यांच्यासह काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.
प्रकाश आंबेडकरांनी मुंबईतील चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आहे. आज (शुक्रवार) आरक्षणाचे जनक राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत आरक्षण बचाव यात्रा आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शाहू महाराजांना वंदन केले.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकच सवाल केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली आहे. तर सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्याची त्यांची मागणी आहे. सगेसोयरे कायद्याला आमचा विरोध असल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकरांनी केला.