23.9 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रमला मिळालेले तीन हजार तीन लाखांसारखे

मला मिळालेले तीन हजार तीन लाखांसारखे

मुख्यमंत्र्यांची बहीण म्हणून कुटुंबात आता माझी नव्याने ओळख - मुख्यमंत्री ‘भावा’शी राज्यातील लाडक्या बहिणींचा मनमोकळा संवाद

मुंबई : प्रतिनिधी
‘मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नव-याकडे रोज हात पसरणार नाही..’ ‘सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहिले’, ‘मला मिळालेल्या तीन हजारांची किंमत ही तीन लाखांएवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली!’ अशा भावना राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केल्या आहेत.

‘तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भगिनींच्या सदिच्छांचा स्वीकार केला. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लाभार्थी महिला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

दि. १४ ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे.. अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला.

राज्यभरातील भगिनींच्या चेह-यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही, ती कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतूद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.
­मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्यापुरती मर्यादित नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे.

यामुळे तुम्हाला कोणाकडे हात पसरावा लागणार नाही. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरू असलेला छोटा-मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने १०८ योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री आज या योजनेच्या माध्यमातून बहिणींसोबत एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेदच्या माध्यमातून बचत गट सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे. पूर्वी बचत गटांसाठी असलेली कर्ज मर्यादा वाढवून २० लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आता त्यामध्ये ५० लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, शैक्षणिक फीसाठी त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी मुलींना शिक्षणामध्ये १०० टक्के फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, युवक-युवतींच्या हाताला काम मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे.

याशिवाय वारक-यांना शासन मदत करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. फक्त रस्ते, पूल बांधणे, दळणवळण उभारणे महत्त्वाचे नाही तर लोककल्याणकारी योजना राबविणेही महत्त्वाचे आहे.

शेतक-यांचे कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्यात आले आहे. ४५ लाख कृषीपंप धारकांना याचा लाभ झाला आहे. तसेच नमो सन्मान योजनेमध्ये केंद्राच्या ६ हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य शासनाचे ६ हजार रुपये आणखी भर घालून आता १२ हजार रुपये शेतक-यांना देण्यात येत आहेत.

एखादी योजना सुरू करणे सोपे काम नाही. तसेच ती एका दिवसातही तयार होत नाही. लाडकी बहीण योजना तयार करण्याचे काम १ वर्षापासून सुरू होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, सचिव यांच्या परिश्रमामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यापर्यंत योजना पोहोचवल्याबद्दल सर्व अधिकारीवर्गाचे मी अभिनंदन करतो.

महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनवणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र काम करत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लाभार्थी महिला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR