24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही

राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही

पालघर : राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची गरज नाही. त्यांचा महायुतीला कोणताच फायदा नाही, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. तर अजित पवारांमुळे महायुतीचे कोणतेही नुकसान नाही. लोकसभेत आलेल्या १७ जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा आहे. मात्र, राज ठाकरेंना सोबत घेऊ नका, असा सल्लाही रामदास आठवले यांनी डहाणू येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजप नेत्यांना दिला आहे. दरम्यान, आठवले यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीसमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. शिवाय, महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंच्या अनेक सभाही घेतल्या होत्या. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वीच जाहीर केले असून, २२५ ते २५० उमेदवार उभे करणार असे म्हटले होते. असे असले तरी ऐन वेळी त्यांना महायुतीचे दरवाजे उघडले जातील अशीही चर्चा आहे. अशात आता लोकसभा निवडणुकीत त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांना महायुतीत घेऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे.

राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?

दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेहमीच राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज ठाकरेंची महायुतीत गरज काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर अजित पवारांमुळे महायुतीला कोणतेही नुकसान झाले नाही, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवारांच्या समावेशामुळे महायुतीत तणाव आहे. शिंदे गटाच्या अनेकांनी अजित पवारांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे. मात्र त्यांच्या समर्थनार्थ आता आठवले हे पुढे आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR