24.4 C
Latur
Sunday, September 22, 2024
HomeUncategorizedमुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ६ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ६ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री वयोश्री योजनेला ज्येष्ठ नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे तब्बल ६ लाखांहून अधिक अर्ज पात्र झाले आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेल्या योजनेसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ६५ वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेकरिता राज्यात तब्बल ६ लाख २५ हजार १३९ ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र झाले आहेत. २३ ऑगस्टपर्यंत राज्यातील २ लाख ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज भरले होते मात्र अवघ्या २०-२५ दिवसांच्या कालावधीतच पुढील ४ लाख ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज देत योजनेला उत्तम प्रतिसाद दिला आहे.

विभागानुसार आकडेवारी
राज्यात मुंबई विभागात ६३ हजार ९०, नाशिक विभागात १ लाख १२ हजार ७६१, पुणे विभागात ९१ हजार ६२५, अमरावती विभागात १ लाख ३२ हजार ७५८, नागपूर विभागात १ लाख १० हजार ४५५, छत्रपती संभाजीनगर विभागात ४२ हजार ९७६, लातूर विभागात ७१ हजार ४७४ अर्ज पात्र झाले आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदी करणे करिता तसेच त्यांचे मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून ३ हजार रुपये थेट लाभ हस्तांतरणव्दारे त्यांना मिळणार आहे. राज्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावर सरकारकडून रक्कम लवकरच पाठवली जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR