बुलडाणा : जळगाव जामोद तालुक्यातीलच दादुलगाव शिवारात जेवनातून एकाच कुटूंबातील ८ जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेत दोन बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला असून तिघांवर खामगाव तर दोन जणांवर अकोला व एकावर जळगाव जामोद येथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व घटनेवर आरोग्य प्रशासन लक्ष ठेवून आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव या गावाशेजारी एका शेतात वीटेची फॅक्टरी असून येथे चार ते पाच आदिवासी कुटुंब कामाला आहेत. याच ठिकाणी ते छोट्या खोल्या काढून वास्तव्यास राहतात. दरम्यान ता. २२ सप्टेंबरच्या रात्री यातील एका कुटूंबातील ७ ते ८ सदस्यांना जेवनातून विषबाधा झाली.
दरम्यान यातील रोशनी सुनील पावरा (वय २ वर्ष) व अर्जुन सुनील लोहारे पावरा (वय ७ वर्ष) या दोघा भावंडांना संडास, मळमळ, उलट्याचा त्रास होऊ लागला. त्याच रात्री दोघा भावंडावर आसलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले व त्यांना सुटी देण्यात आली. परंतु दुसऱ्या दिवशी परत त्यांना संडास उलट्यांचा त्रास होत असल्याने त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
तर आदिवासी कुटुंबातील उमेश अशोक पावरा (वय-८ वर्ष), आरती अशोक पावरा (वय-६ वर्ष), देवकी सुनील पावरा (वय-४.५ वर्ष), वैशाली सुनील पावरा (वय-८ वर्ष), सुनिल बद्री लोहारे पावरा (वय-३५ वर्ष) यांच्यासह आणखी एका गर्भवती महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोग्य प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे.