25.7 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeराष्ट्रीययंदाचा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांचा

यंदाचा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांचा

पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी २०२५ चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाबद्दल निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणाले, सर्वजण तुमची प्रशंसा करत आहेत.

पंतप्रधान म्हणाले हे बजेट सामान्य नागरिक, विकसित भारताचे ध्येय पूर्ण करणार आहे. या अर्थसंकल्पामुळे गुंतवणूक आणि वापर वाढेल. जनतेचा अर्थसंकल्प तयार केल्याबद्दल मी अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो. भारतात मोठ्या जहाजांच्या बांधकामाला प्रोत्साहन दिले जाईल. हे असे क्षेत्र आहे जे जास्तीत जास्त रोजगार प्रदान करते. देशात पर्यटनासाठी खूप संधी आहेत. या अर्थसंकल्पामुळे पर्यटनाला बळकटी मिळेल.

प्रत्येक भारतीयाच्या स्वप्नांना पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही तरुणांसाठी अनेक क्षेत्रे खुली केली आहेत. हे विकसित भारताच्या ध्येयाला चालना देणार आहे, हे बजेट एक शक्ती गुणक आहे. अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी एक घोषणा करण्यात आली आहे. १०० जिल्ह्यांमध्ये सिंचन आणि पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. आपल्या मध्यमवर्गीय आणि कष्टकरी लोकांना याचा खूप फायदा होईल.     अर्थसंकल्पात उत्पादनावर 360 अंशाने लक्ष केंद्रित केले आहे. एमएसएमई आणि लघु उद्योगांना बळकटी मिळेल. चामडे, पादत्राणे आणि खेळणी उद्योगांना विशेष मदत देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया
अर्थसंकल्प देशाचा की बिहारचा : तिवारी
काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले मला हे समजण्यात अपयश आले की हा भारत सरकारचा अर्थसंकल्प आहे की बिहार सरकारचा? केंद्रीय अर्थमंर्त्यांच्या संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणात तुम्ही बिहार सोडून इतर राज्याचे नाव ऐकले आहे का?

विकसित भारताची हिच व्याख्या? : यादव
आमच्यासाठी महाकुंभ चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी बजेटच्या आकड्यांपेक्षा महत्त्वाची आहे. किती लोक मरण पावले, बेपत्ता झाले किंवा किती जखमी झाले हे सरकार सांगू शकत नाही. लोक चेंगराचेंगरीत मरतील ही तुमची विकसित भारताची व्याख्या आहे का?

अर्थसंकल्पीय भाषणात राजकीय अजेंडा : चामला
काँग्रेस खासदार किरण कुमार चामला म्हणाले- जेव्हा आपण अर्थसंकल्पात राज्यांबद्दल बोलतो, तेव्हा आपण पाहिले की बिहारला खूप महत्त्व दिले गेले आहे, तर तेलंगणासारख्या राज्यांनाही खूप महत्त्व दिले गेले असावे अशी आमची अपेक्षा आहे. आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात राजकीय अजेंडा आहे.

निराशाजनक अर्थसंकल्प : मारन
द्रमुक खासदार दयानिधी मारन म्हणाले की हा अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्र्यांनी १२ लाख रुपयांवर कोणताही कर नसल्याचे सांगत मोठी सूट दिली आहे. मग त्या म्हणतात ८-१२ लाख रुपयांसाठी १०% चा स्लॅब आहे. त्यामुळे खूप गोंधळ होतो. बजेटमध्ये बिहारसाठी खूप काही आहे कारण बिहारमध्ये यंदा निवडणुका आहेत. तामिळनाडू किंवा इतर कोणत्याही दक्षिणेकडील राज्यासाठी एकही शब्द नाही.

पंतप्रधानांचा संकल्प : शिंदे
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की हा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी आहे आणि नवीन आणि उत्साही भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा पंतप्रधानांचा संकल्प आहे. प्रत्येक परिसराचा योग्य अभ्यास करून नवा नकाशा तयार करण्यात आला आहे. हा एक संपूर्ण अर्थसंकल्प आहे जो भारताला पुढे घेऊन जाईल आणि भारताला केवळ स्वावलंबी बनवणार नाही तर जागतिक नेता म्हणूनही स्थापित करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR