मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेचा वाढता खर्च पाहता शिवभोजन थाळी बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी योजना बंद करू नका. गरजू आणि गरीब जनतेसाठीची ही योजना आहे, असे सांगत ही योजना बंद न करण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळे या एका योजनेचा फटका शिवभोजन थाळी योजनेला बसण्याची शक्यता आहे. शिवभोजन थाळी या योजनेमुळे सामान्य जनतेला दहा रुपयांत चांगले अन्न मिळते, असेही वडेट्टीवारांनी म्हटले आहे. शिवभोजन थाळीबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, शिवभोजन थाळी या योजनेमुळे सामान्य जनतेला १० रुपयांत चांगले अन्न मिळते.
लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर एकीकडे सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना सुरू ठेवली पाहिजे, असे वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा त्या शिष्टमंडळासोबत मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेत शिवभोजन थाळी बंद न करण्याची मागणी केली आहे.