30.3 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रअधिका-यांवर नाराजीची चर्चा

अधिका-यांवर नाराजीची चर्चा

खुलासा करताना उदय सामंतांनी थेट पत्रच दाखवले

मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असून त्यांनी ही नाराजी व्यक्त करणारे पत्र प्रधान सचिवांना लिहिल्याची चर्चा रंगत होती. या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा केला आहे. मी उद्योगमंत्री म्हणून ४ फेब्रुवारी रोजी उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांना एक पत्र लिहिले होते. मंत्री म्हणून मला प्रधान सचिवांकडून कसे काम अपेक्षित आहे, याबाबत सूचना करणारे ते पत्र होते. या पत्रात मी कसलीही नाराजी व्यक्त केली नव्हती. माझी नाराजी असण्याचे काहीच कारण नाही. प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेताना त्याची कल्पना मला द्यावी असे मी पत्रातून सांगितले आहे. कारण हे निर्णय घेतल्यानंतर त्याची माहिती पत्रकार परिषदेतून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला त्या निर्णयांची माहिती असणे आवश्यक आहे अशी भूमिका सामंत यांनी मांडली आहे.

उदय सामंत पुढे म्हणाले की सत्तेचे विकेंद्रीकरण जसे राजकारणात महत्त्वाचे आहे तसे अधिकारांच्या बाबतही महत्त्वाचे आहे. सगळ्याच गोष्टी मंत्र्यांकडे सहीसाठी आल्या पाहिजेत असे असू नये, अशी भूमिका मी पत्रातून मांडली आहे. मी प्रधान सचिवांवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही, कारण मी कॅबिनेट मंत्री आहे आणि ते माझ्या हाताखाली काम करतात. मी २०१३ मध्ये ९ खात्यांचा राज्यमंत्री होतो. त्यानंतर म्हाडाच्या अध्यक्षपदासह विविध जबाबदा-या पार पाडल्या आहेत आणि आता उद्योगमंत्री आहे. त्यामुळे प्रधान सचिव म्हणून त्यांचा मान-सन्मान, त्यांचे अधिकार आणि मंत्री म्हणून माझे अधिकार मला माहीत आहेत. फक्त प्रधान सचिवांनी उद्योग विभाग सहजरीत्या सांभाळला पाहिजे, त्याचा फायदा लोकांना आणि उद्योजकांना झाला पाहिजे, यासाठी मी ते पत्र लिहिले आहे असे स्पष्टीकरण उदय सामंतांनी दिले आहे.

मी ४ तारखेला पत्र लिहिल्यानंतर यावर ५ तारखेला पत्रकार परिषद घ्यावी लागणार, हे मला माहीत होते. उलट हे पत्र आज १० तारखेला म्हणजे सहा दिवस उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचले असा टोलाही सामंत यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR